Thursday, September 19, 2019

खिलाडी अक्षय कुमार!!!!



कुठून आणतात एवढा तिरस्कार ही लोकं ???

एकेकाळी स्वतः राज ठाकरे जाहीर सभेत बोलायचे,की अमिताभ बच्चन महानायक असून महाराष्ट्रासाठी काही करत नाहीत, त्यांच्या स्वतःच्या राज्यात मात्र देणगी देतात, मग जिथे राहता तिथे का नाही...???

आणि आज तोच माणूस, जमेल त्या प्रकारे काही ना काही तरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो समाजासाठी, तर हीच लोक आज अक्षय कुमार वर टीका करत आहेत कशासाठी? हा दुटप्पीपणा कशासाठी? दुसऱ्यांना अधिकार आहे का नाही, हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला??

तो करोडोंवर कमावतो, तर उपकार नाही करत,
तो टॅक्स भरतो, तर आमच्या जीवावर कमावतो,
तो भारताबद्दल बोलतो, तर तो कॅनेडियन आहे,
तो देशभक्तीपर चित्रपट बनवतो,तर तो भांडवल करतो,
तो मोदींची मुलाखत घेतो, तर तो देशद्रोही आहे,
तो मेट्रोबद्दल बोलतो, तर त्याला अधिकार नाही,त्याने तोंड घालू नये

पण हा 'तोच' आहे
जो पूरग्रस्तांना मदत करतो,
जो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करतो,
जो कॅन्सर पिडितांना मदत करतो(जाहीर न करता, पोलीस अधिकाऱ्यांनी हे उघड केलं),
जो देशातील सर्वात जास्त सन्मानित सेवेत आपला जीव गमावणाऱ्या 'भारतीय' सैनिकांच्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो,
तो "भारत के वीर", या कसल्याच प्रकारचा मध्यस्थी नसलेल्या App ची संकल्पना मांडतो, स्वतःच्या प्रभावाचा वापर करून ते अस्तित्वात आणतो, ५० लाखांहून अधिक लोकांनी याचा वापर केला, करोडो लोकांनी अनाथ झालेल्यांसाठी देणग्या दिल्या, अनेक कुटुंबाना आधार मिळाला...

तरी तो काय करतो???
हे नीट समजून घ्या👇🏽
इंडस्ट्रीत सध्या सुपरस्टार मोजून ६, सगळ्या निर्मात्यांची आणि वितरकांची इच्छा असते की या स्टार्सनी खूप चित्रपट करावेत, पण हे बहुतांश स्टार्स वर्षांतून फक्त १ किंवा २ चित्रपट करतात, (त्यांची वयक्तिक कारणं असतील)

पण अक्षयकुमार दर वर्षाला ४ चित्रपट करतो,
एका चित्रपट निर्मितीत,
१० ते १५ प्रमुख कलाकार,
७० ते १०० च्या जवळपास सेट वरची टिम,
१०० च्या जवळपास ज्युनिअर आर्टिस्ट,
पोस्ट प्रोडक्शन सिंगिंग,एडिटिंग, डबिंगसाठी काम करणारी वेगळी टीम,
PR आणि मार्केटिंग साठी एक टीम,
आणि त्यानंतर देशभरातले वितरक,थेटर मालक हे सगळे समाविष्ट असतात

हे सर्व कमावतात जेंव्हा एक सुपरस्टार एका चित्रपटासाठी तयार होतो, जेंव्हा हाच चित्रपट १०० ते २०० करोड कमावतो त्यातून साधारण २० ते ४० करोड मनोरंजन कर शासनाला जातो, असे वर्षातून एकामागून एक चित्रपट 'तो' करतो, वितरक आणि निर्माते त्याला 'मिनी इंडस्ट्री' म्हणतात, कारण तो काम करतो

इतकी जुनी इंडस्ट्री, एकाहून एक मातब्बर, तरी अक्षयकुमारनेच स्टंटसमन आणि त्यांच्या कुटुंबाचा मुद्दा वरच्या पातळीवर घेतला, कारण ते स्वतःचा जीव धोक्यात घालून सुपरस्टार्सना मोठं करतात,
ही सगळी लोकं त्याला नेहमीच आपलं म्हणतात, त्याला डोक्यावर घेतात, मान देतात...
तरी 'तो' कोण ???

इतका मोठा सुपरस्टार, अनेक निर्माते अवलंबून, तरी हा माणूस नेहमीच त्यांच्याशी साधारण वागतो, वेळ पाळतो, निर्देशकाचे ऐकतो, Tantrums नसतात,

तो पडद्याआड तुम्हाला चांगल्या सवयी शिकवतो, स्वतः पाळतो, ९ वाजता झोपतो, ४ ला उठतो, पार्ट्या टाळतो, ड्रिंक्स, धुम्रपान टाळतो,

IAS ऑफीसर्स च्या batch ला (LABSNAA मध्ये)  'तो' ट्रेनिंग सेशन देतो,
IPS अधिकारी बरोबर ( SPVNPA मध्ये) ज्युडो चे सेशन करतो,
तरुणांनी अनुकरण कराव्या अशी जीवनशैली जगतो,
कुठल्याही सुपरस्टार च्या स्टेटस ला घाम फुटेल, अशा "Padman" आणि "टॉयलेट एक प्रेम कथा" सारख्या सामाजिक विषयावर तो बिनधास्त चित्रपट करतो, सामाजिक जागृती करतो...
तरीही 'तो' कोण???

जर एक 'कॅनेडियन' हे सर्व काही करतोय, तर भारतीय म्हणून, निरर्थकपणे बोंब ठोकणाऱ्या तुम्हाला "लाज" वाटली पाहिजे...

त्याचं मेट्रोबद्दलचं विधान सोडा, तुम्हाला त्याच्या विधानाबद्दल लुडबूड करण्याचा अधिकार काय?

तुम्हाला चांगलं करता येत नसेल... तर निदान घाण तरी करू नका...
तिरस्कारापोटी इतकेही अंध होऊ नका की चांगल्या आणि वाईटातला फरक देखील समजायला नको, तो तर ढुंकूनही भाव देत नाही अशा टीकेला, 'खिलाडी' साठी या गोष्टी चिल्लर आहेत, हा तोच आहे जो स्वबळावर सुपरस्टार आहे, तुमच्या नावडत्या नेत्याची त्याने मुलाखत घेतली म्हणून त्यासाठी इतकी आगपाखड???

BJP ला विरोध, मान्य.
मोदींना विरोध, मान्य.
प्रकल्पाला विरोध, मान्य.
पण, एखाद्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याला विरोध???
मान्य नाही !!!

'तो' जो बोलतो, ते करतो... आणि जे बोलत नाही... तेही करतो !!!
 म्हणूनच तो सच्चा खिलाडी असतो आणि फक्तं तोंडाची वाफ करणारे वाचाळवीर ज्यांची किंमत नखा मधील मळा एवढी..
🙏🏼
#AkshayKumar #Khiladi

Saturday, July 6, 2019

कौन " जात " हो अम्मा???


एक आटपाट नगर होते.. त्यात एक राजा होता.. त्याची प्रजा होती. काही सेवक होते.काही दास होते. एके दिवशी अचानक एक जण उठतो आणि राजा आणि त्याची प्रजा तसेच राजाच का उच्च आणि आपण कनिष्ठ ह्या व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित करतो..त्याला राजाचे सैनिक पकडतात आणि brainwash camp मध्ये पाठवतात आणि त्याच्या मनावर ठसवले जाते की ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करताना हे नियम सांगितले आहेत ज्यामुळे समाजातील संतुलन कायम राहील.. आपल्याला हे संतुलन बिघडवण्याचा काहीच अधिकार नाही. आणि सर्व जण समान झाले तर राज्य कोण करणार.. आपला उद्धार कोण करणार??? त्या उठाव करणाऱ्या व्यक्तीला हि गोष्ट पटते आणि तो राजदरबारी सेवक म्हणून रुजू होतो.
नव्यानेच आलेल्या आर्टिकल 15 ह्या चित्रपटात ह्याच व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचा एक प्रयत्न अनुभव सिन्हा ह्या दिग्दर्शकाने केला आहे.


दिल्लीस्थित उच्चभ्रू वर्गातील अयान रंजन आयपीएस होऊन पोस्टिंगसाठी (इथला आयपीएस आयान(आयुष्मान) हा माझ्या आवडत्या सरफ़रोश मधील आयपीएस राठोड(आमिरखान) पेक्षा देखील ग्राउंड वर आहे व  हिरोगिरीच्या अनेक शक्यता व जागा असतांनाही तो संयत आहे हे विशेष) उत्तर प्रदेशमध्ये एका मागास जिल्ह्यात येतो आणि तिथे निर्माण झालेल्या व्यवस्थेचा आव्हान देऊन तिथे एका दलीत कुटुंबावर होणाऱ्या अत्याचारास वाचा फोडतो आणि न्याय मिळवून देतो..
तसे बघायला गेले तर गोष्ट एवढीच.. देश स्वतंत्र झाल्या पासून अशा हजारो घटना घडल्या आहेत जिथे बहुसांख्यिकी लोकांनी अल्पसंख्याक वर अत्याचार केलेत.. स्थळानुसर बदल फक्त कथेच्या पात्रांमध्ये आहे. कधी हिंदू कधी मुस्लिम तर कधी दलित वा कधी सवर्ण..पण समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये आणि प्रत्येक स्तरावर अत्याचार होतच आहेत
मग आज नवीन काय??

ह्या चित्रपटाने व्यवस्थेच्या संवेदनशीलता वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. झाडाला लटकणारे १५ वर्षीय मुलींचे शव बघूनही लहान मुलगा शांतच राहतो.. आपल्या सांगण्या प्रमाणे मेडिकल रिपोर्ट बदलत नाही म्हणून डॉक्टर लाच हिनवून आमच्या टॅक्स च्या पैसावर कोटा मार्गाने शिकतात अशी कॉमेंट करणे..आणि असे बरेच प्रसंग आपल्याला पुन्हा पुन्हा माघे वळून पाहण्यास मजबूर करतात..आणि मन आपल्या आजुबाजूस घडणाऱ्या गोष्टीशी संबंध जोडायला लागतो.
ये औकात क्या होती है? याचे दिले गेलेले उत्तर, ' उतना देते हैं जितनी उनकी औकात है.'  चित्रपटात औकात शब्द अनेकदा येतो आणि त्यात त्याचा त्या वातावरनातील अर्थही असा उलगडून सांगितला जातो.

दिल्ली निर्भया केस, जम्मू काश्मीर रेप केस व कठूआ रेप अँड हँग केस या सर्व सत्य घटनांची आठवण हा चित्रपट पाहतांना येतो. पण मुळात तो फक्त या विषयावर नसून जातीत गाडल्या गेलेल्या भारतीय मानसिकतेवर आहे.
म्हणून आर्टिकल 15 हे घटनेचे सेक्शन मोठ्या कागदावर प्रिंट काढून अंशुमन पोलीस स्टेशन च्या बाहेर लावतो तेव्हा सर्व जण उत्सुकतेने ते वाचायला लागतात. आपली ओळख सांगतांना ते अशा पद्धतीने जातींचा उल्लेख करतात जस ते आपली वेगवेगळी नावे सांगत आहेत. उत्तर भारतात काम करणारे मित्र सांगतात तिकडे 'कौन जात' हा प्रश्न खूप नॉर्मल आहे, त्याची सवय होईपर्यंत खूप ऑकवर्ड वाटते नंतर सवय होते. हि सवय इतकी नॉर्मल बनते कि त्या उत्तरावर आधारित discrimination व्हायला लागते ते कळत नाही व आपण काही गुन्हा करतोय हेही कळत नाही. भयंकर आहे सगळे.

आर्टिकल 15 ने हे संवेदनशीलतेवर प्रश्न करणारे बेरिंग कुठेही सोडले नाही याबाबत डायरेक्टर अभिनंदनास पात्र आहे. प्रशासनातील खालच्या स्तरावर काम करणारे कर्मचारी वा अधिकारी मग ते पोलीस असो डॉक्टर असो वा अजून कोणी पण त्यांच्यातील परस्पर संबंध जातीसह अनेक बाबतीत किती गुंतागुंतीचे असतात व बॉस बदलला कि त्यांना ते कस बदलाव लागत हि एक वेगळी बाजू यात दाखवली आहे. याबाबतील दृश्य व डायलॉग्ज वास्तववादि आहेत.
'आप को झाड़ू ही लगाने देना चाहिए था.......'  या अपमानावर फक्त डोक्यातील टोपी काढून 'कब तक लगायेंगे हम झाड़ू ...म्हणून त्या दलित पोलिसाच्या चेहर्यावरील हावभाव खुप काही सांगुन जातात...त्याने न बोललेले पुढील अनेक संवाद आपल्या डोक्यात चमकुन जातात. पण त्याचे ते त्या प्रसंगी शांत राहने हजार शब्दांचे काम करतात.

चित्रपटातील अजुन एक उल्लेखनीय बाब म्हणजे वर वर आपण कितीही आदर्शवादी गप्पा मारल्या तरी  गटारी साफ़ करणे, मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावने हि सर्व तुच्छ समजली जाणारी कामे अजुनही दलित समाजातील लोकच करत आहेत  हे अनेक लहान मोठ्या दृश्यातुंन पण तरीही अंडरटोन राहून चित्रपटात दाखवले आहे. तो टोन खर तर प्रेक्षकांनी पकड़ने गरजेचे आहे. पोलिस स्टेशन मधील गटारीचे मेन होल मधील गटारीतील घाण उपसताना दाखवलेला कामगार हा या जगाचे प्रतिनिधिक रूप दाखवतो. कोर्ट या मराठी चित्रपटात या बाजूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण तो इतक्या अबोध स्वरूपात दाखवला गेला होता की तो सामान्य प्रेक्षकांपर्यन्त फारसा पोहचला नाही.

ज्या प्रमाणे सीमेवरील जवान लढताना शहीद होतो आणि त्याचे सन्मान केला जातो पण आपणास माहीत आहे का की गटार साफ करणाऱ्या सरकारी कर्मचारी मधे मरणाचे प्रमाण कितीतरी जास्त आहे पण संवेदनशीलता हरवलेल्या समाजाला फक्त तैमूरचेच रडणे दिसणार..पण काही घटकांचा आक्रोश नाही..
"हम कभी हरिजन हो जाते है, तो कभी बहुजन हो जाते है, बस जन नहीं बन पाते. वो जन गण मन वाले जन मे हमारी भी गिनती हो जाये" अस सणसणीत वास्तव पण आपल्यापुढे मांडलं जात तेव्हा ते सर्वांना पटतं.

आपल्या संगणीला आयुष्यमान खुराणा परिस्थिती समजून सांगत असताना विषण्णपणे म्हणतो की इथे खूप UnMess झाल्यात गोष्टी.. हा शब्दच मुळी नाही असे म्हणाल्यावर नवीन शब्द आणि नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागतील हे सांगताना त्याच्या डोळ्यातील भाव खूप काही सांगून जातात.

देशाच्या संविधानाला केराची टोपली दाखवणाऱ्या समाजाला ज्यावेळेस निषाद "यही तो लढाई है की इस संविधान की.. उस किताब की चलानी पडेगी ओर उसिसे चलेगा ये देस " हा आशावाद दाखवला जातो तेव्हा डोळस प्रत्येक नागरिकाचा चेहरा तिथे प्रतित होत राहतो.

एका मोहिमेवरून परतल्यावर सर्व जण थकून भुकेले असतात तेव्हा एका अनोळखी अम्मा ने बनवलेली रोटी खातात आणि खात असताना आयुष्मान अचानक विचारतो की कोण जात हो अम्मा आणि तिचे उत्तर ऐकण्याची उत्सुकता वाढली असतानाच तिथून एक ट्रक मोठा हॉर्न वाजवत जातो ज्याचा माघे लिहले असते.. "मेरा भारत महान." आणि आपल्या येणाऱ्या भविष्याचे आशावादी चित्र स्पष्ट होत राहते.

अनुभव सिन्हा ह्यांच्या ह्या चित्रपटामध्ये हि सर्व भावनिक उलथापालथ बघायला मिळते.. हरवलेली संवेदनशीलता दिसते आणि कुठे कुठे आशावाद ही येत राहतो..पण प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट अधोरेखित होत राहते की देशाला हिरोची गरज नसून अशा लोकांची गरज आहे जे हिरोची वाट न पाहता समाजातील चुकीच्या गोष्टींसाठी लढाई करतील.
चला तर मग लागा कामाला...
जाता जाता...
प्रभू रामचंद्र वनवास संपवून परत येत असतात.. जागोजागी प्रत्येक गावात दिव्यांची सजावट आणि लखलखाट केलेला असतो..फक्त एका गावात अंधार पसरलेला असतो. प्रभू राम ह्यांच्या लक्षात येते आणि ते त्या गावकऱ्यांना विचारतात की काय झाले..तुम्ही आनंदी नाहीत का.. गावकरी सांगतात.. प्रभू दिवे तर आम्ही पण लावले होते पण अचानक एक वादळ आले आणि सर्व दिवे अचानक  विझले.पण त्या नंतर आमची नजर तुमच्या महालावर पडली तर तो अधिकच चमकदार आणि रोषण दिसला. आणि म्हणून आम्ही दिवे पुन्हा पेटवलेच नाहीत..
आता हा प्रश्न मी तुमच्या वरच सोपवतो की त्यांनी दिवे पेटवावेत की नाही..???

जयहिंद.. वंदे मातरम्!!!

Thursday, May 30, 2019

""बऱ्याच दिवसांची खदखद""

 ज्या क्षणाला राहुल गांधी ने अकलेचे तारे तोडत सावरकरांवर टीका केली होती त्या क्षणापासून महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याने मग तो कोणत्याही पक्षाचा धर्माचा असो त्याने निषेध तरी व्यक्त करायला पाहिजे होता..
पण इथेही देशासाठी त्याग करताना जात आडवी येते..प्रश्न विचारले जातात राजू शेट्टी सारख्या व्यक्ती कडून की ब्राम्हणामधू न किती जन फौज मधे गेले..
त्यामुळं कधी कधी जातीपेक्षा धर्मवाद चांगला असे वाटायला लागते..पण त्याचेही समर्थन करणे अयोग्य..
सावरकर योग्य की अयोग्य असे वाद रंगवले जातात एबीपी माझावर आणि टीआरपी घसरला की माफीनामा..अशे हे pseudo secular फक्त आणि फक्त शिक्षेच्या लायक आहेत
ने मजसी परत मातृभूमीला म्हणताना किती तळमळला असेल त्याचा जीव.. हृदय पिळवटून टाकणारी आर्त हाक ही ब्राम्हणांसाठी नव्हती तर देशासाठी होती..
सावरकर ह्यांनी स्थापन केलेले अभिनव भारत.. मित्रमेळा आणि त्यांच्या भावंडांनी देशासाठी अर्पण केलेले जीवन ह्यांचे मोल ह्या दिड दमडीच्या राहुल ने करावे आणि त्यावर सगळ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याने चुप्पी साधावी हे अनाकलनीय..
मग आता हे काही दिवसांनी म्हणणार की भाजपा आणि शिवसेनेला की सावरकरांची मक्तेदारी तुमचीच का..कारण त्या वेळेस सावरकर मोठे झाले असतील..पण ज्या वेळेस सावरकर ह्यांच्या वर शिंतोडे उडत होते तेव्हा कुठे होते तुम्ही..
गोडसे ने गांधींना मारले म्हणून ब्राम्हण दहशतवादी होत नाहीत पण उगीच प्रश्न केले जातात तुम्हाला गांधीचा देश हवा का गोडसे चा??
मग तर तथाकथित जाणता बारामतीकर पण म्हणतो की अर्ध्या चड्या बघायला लाऊ नको..म्हणून..
हीच ह्यांची मानसिकता.. आत्ता आत्ता पगडीवरून राजकारण चालू केले होते पण डाव फैल गेला..
राजस्थान मधील काँग्रेस सरकारने सावरकरांचे पाठ्यपुस्तक मधील स्थान काढले..
सावरकर देशासाठी लढले आणि संपूर्ण जीवन देशासाठी व्यतीत केले..ह्या बाबत शंका नाही..
पण साधा निषेधही व्यक्त नाही हा कसला एवढा लाचारपणा..देशासाठी..
हो..चुकीचे वागले असतील तर करा की टीका..
सूर्याजी पिसाळ सारख्या गद्दरला करा की टीका..त्याने काय मराठी जमात बदनाम नाही होत..पण सावरकर ह्यांच्या वर टीका कारण ते ब्राम्हण हे मनाला पटत नाही आणि रुचातही नाही..
पुरोगामी महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकशाहीवादी नागरिकास नाहीच नाही..
ह्यांच्या बुध्दीचा आणि समाजातील घटकांचा आणि देशासाठी प्राण अर्पण केलेल्या प्रत्येक लहुचा काहीच संबंध नाही हे जाणवते..
सावरकर आणि इतर सर्व जे देशासाठी लढले झगडले आणि सर्व जीवन व्यतीत केले ह्या देशाच्या मंगल व्हावे ह्या भावनेने..हे माझे शब्द त्यांना अर्पण..
..
जय हिंद..

Friday, April 5, 2019

*आपली राष्ट्रीय दांभिकता*

सरकारच्या नावाने बोंबलणे थांबवा!
सरकारे खुप बदलली,आता लोकच बदलणे बाकी आहे!

देशाच्या प्रगतीचे मापन करायचे असेल तर नागरिक काय लायकीचे होते आणि आता काय लायकीचे झाले, या निकषावर करायला हवे.
सातत्याने ढासळत जाणारा नागरिकांचा दर्जा हा राष्ट्रीय काळजीचा विषय असायला हवा.
बोगीतील संडासातल्या टमरेलला साखळी बांधण्याची आयडिया ज्या कुठल्या कल्पक अधिकाऱ्याला सुचली असेल, त्याला शोधून काढून रेल्वे बोर्डाचे चेअरमन करायला हवे.भारतीय नागरिकांचे त्याचे आकलन हे श्रेष्ठ दर्जाचे आहे.
‘तेजस’ या आधुनिक, वेगवान रेल्वेत सुंदर बाकडी, एलईडी, छान वातानुकूलित व्यवस्था आणि असे बरेच काही असावे, ही कल्पना ज्याने मांडली त्याचे भारतीय नागरिकांचे आकलन कमी आहे, या कारणावरून निलंबनच करायला हवे.....
हातगाडीवर बसवून न्यायच्या लायकीच्या लोकांना त्याने पालखीत बसवून रुबाबात न्यायचे स्वप्न पाहण्याचा प्रमाद केला आहे.
एका श्रेष्ठ भारतीय नागरिकाने ,एका प्राणीसंग्रहालयात,पिंजऱ्यातील माकड जाळीजवळ आल्यावर त्याच्या अंगाला खाजखुजली लावली होती आणि माकड खाजवून खाजवून वेडेपिसे झाल्याचा व्हिडीओ फेसबुकवर टाकला होता.
रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे, गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे, ऐतिहासिक इमारतींवर स्वताःचे आणि स्वताःच्या टिनपाट मैत्रिणीचे नाव कोरणारे, कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करून पाणी न टाकता निघून जाणारे, शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे, सार्वजनिक उत्सवात, लोकांकडून जमविलेल्या वर्गणीतून अवास्तव खर्चाच्या नावाखाली कमिशन म्हणून आपली तुंबडी भरणारे,
सार्वजनिक गणेशोत्सव बाप्पाच्या पुढ्यातील फुले प्रसाद आपल्या बापाचा समजून घरातील फ्रिजची कपाटं भरणारे बाप्पाचे उत्साही कार्यकर्ते, नेतेपणाची हौस भागवणारे बिनबुडाचे महाभाग, सण ऊत्सवाच्या नावाने पोटभर दारु फुकटात मिळते म्हणुन मिरवणारे !
रस्त्यावरची बाकडी- रोड डिव्हायडर - फरशा चोरून नेऊन विकणारे, एसटी किंवा रेल्वेचे सीट कव्हर सहज विरंगुळा म्हणून फाडणारे...हीच आपली ओळख आहे.
या ओळखीबद्दल काय बोलणार...?
वर्तमान लाजीरवाणा आणि भिकारडा असला की गतकाळातल्या फुशारक्या मारण्याशिवाय आपल्या हातात दुसरे काय उरते.....?
सरकार बदलून खूप प्रयोग करून झाले. त्याने काही फरक पडत नाही. आता जनताच बदलायला पाहिजे. या देशात जर सुधारणा घडवून आणायच्या असतील, तर आपले नागरिक देशातून हाकलवून देऊन बाहेरच्या देशांतले चकचकीत लोक आयात करणे अतिशय आवश्यक आहे.
आणि तसे जर करायचे नसेल, आणि आपल्याच नागरिकांना जाब विचारायचा असेल तर मग मागच्या ६३ वर्षांत तुम्ही अजूनही टुकार नागरिकच का आहात, असा प्रश्न विचारायला हवा....!
सरकार काय, मतदानाने कधीही बदलता येईल. जे कधीच बदलत नाहीत आणि दिवसेंदिवस अधिकच भिकार दर्जाचे बनत चाललेत, त्या नागरिकांचे काय करायचे.....?

जय हिंद!!!